प्रतिनिधी | वर्धा
पोलीस प्रशासन आणि जनता यांच्यात थेट समन्वय वाढवून नागरिकांच्या अडीअडचणी जागेवरच सोडवण्यासाठी वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘संवाद’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मंगळवार, दि. ३० जून २०२६ रोजी मौजा टाकरखेडा (ता. आर्वी) येथील संत लाहनुजी महाराज संस्थान येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल प्रमुख उपस्थित होते.
दुपारी १२ ते २ या वेळेत पार पडलेल्या या बैठकीत पोलीस विभागासह महसूल, पंचायत समिती, आरोग्य, कृषी, विद्युत, वन विभाग तसेच इतर शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध विभागांशी संबंधित समस्या आणि तक्रारी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळाली.
यावेळी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. या संवादात टाकरखेडा व परिसरातील सुमारे ३०० ते ४०० नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी सहभाग घेत गावातील प्रमुख समस्या मांडल्या. गावात पोलीस चौकी सुरू करणे, आर्वी-टाकरखेडा मुख्य रस्त्याची दुरुस्ती करणे, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करणे तसेच बिबट्याच्या वाढत्या त्रासावर उपाययोजना करणे या प्रमुख मागण्या नागरिकांनी मांडल्या.
यावेळी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना पुढील आठ दिवसांत वीज समस्येचे निराकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच खराब रस्त्याचे कामही आठ दिवसांत सुरू करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले.
पोलीस अधीक्षकांनी स्थानिक ठाणेदारांना अवैध धंदे आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. गावात सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत किंवा संशयास्पद हालचालींबाबत नागरिकांनी गोपनीय माहिती थेट पोलीस प्रशासनाला द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गुन्हेगारी नियंत्रण आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस व नागरिकांमधील समन्वय अधिक मजबूत होणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले.
वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात येणाऱ्या या ‘संवाद’ उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, यापूर्वीही जिल्ह्यात २५० हून अधिक संवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाठ, संत लाहनुजी महाराज संस्थानचे सचिव सतिष ठाकरे, तहसीलदार हरिश काळे, आर्वी वन परिक्षेत्र अधिकारी, आर्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश डेहनकर, विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे टाकरखेडा परिसरात पोलीस प्रशासन आणि शासनाविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
