शहादा | प्रतिनिधी
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयात १ जुलै रोजी कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कृषी दिनानिमित्त तालुक्यातील सात गावांमध्ये ‘खेती बचाव अभियान’ राबविण्यात आले.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पटेल यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिवादन केले.
कृषी दिनानिमित्त महाविद्यालयातर्फे परिसरातील शेतकऱ्यांसाठी ‘खेती बचाव अभियान’ राबविण्यात आले. या अभियानांतर्गत शहादा तालुक्यातील तिखोरा, मोहिदा त. ह., अलखेड, चिखली, कानडी, पाडळदा आणि म्हसावद या गावांमध्ये शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले.
या मेळाव्यांमध्ये विषय विशेषज्ञ प्राध्यापक तसेच ‘रावे’ (RAWE) अंतर्गत कार्यरत कृषी दूत व कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना मातीचे महत्त्व, माती तपासणी, जमिनीची सुपीकता सुधारणा आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले.
विविध गावांतील मार्गदर्शन
- तिखोरा येथील त्रिंबकेश्वर महादेव मंदिरात प्रा. अनिल पाटील यांनी मार्गदर्शन केले.
- अलखेड येथील श्रीराम मंदिरात प्रा. कृणाल पाटील यांनी माहिती दिली.
- चिखली व कानडी येथील समाजगृहात डॉ. सचिन चौधरी यांनी संवाद साधला.
- पाडळदा येथील मुरली मनोहर मंदिरात प्रा. विलास पाटील यांनी मार्गदर्शन केले.
- मोहिदा त. ह. येथील श्रीकृष्ण मंदिरात प्रा. विजय सपकाळ यांनी तांत्रिक माहिती दिली.
- म्हसावद येथील धनगर मढी परिसरात डॉ. भरत चौधरी यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.
मेळाव्यांदरम्यान आयोजित कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनाच्या माध्यमातून आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषी अवजारे आणि सुधारित पीक पद्धतींची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, संचालक मयूर पाटील तसेच प्राचार्य डॉ. प्रकाश पटेल यांचे मार्गदर्शन लाभले.
