शहादा | प्रतिनिधी
शहादा शहरातील बस स्थानकापासून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत तसेच इतर प्रमुख रस्त्यांवरील झाडांच्या वाढलेल्या व रस्त्यावर झुकलेल्या फांद्यांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने तातडीने झाडांची छाटणी करावी, अशी मागणी नागरिक आणि वाहनधारकांकडून होत आहे.
बस स्थानक ते शिवाजी महाराज स्मारक या मुख्य मार्गावरील दुभाजकातील तसेच म्युनिसिपल हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या फांद्या रस्त्यावर झुकल्या आहेत. यामुळे समोरून येणारी वाहने स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः दुचाकीस्वार, रिक्षाचालक आणि चारचाकी वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील इतर रस्त्यांवरही झाडांच्या मोठ्या फांद्या रस्त्यावर वाकून आल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. काही ठिकाणी बस आणि अवजड वाहन चालकांनाही वाहन चालविताना विशेष दक्षता घ्यावी लागत आहे. पावसाळ्यात जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे या फांद्या तुटून वाहनांवर किंवा पादचाऱ्यांवर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अलीकडेच मुंबईतील चेंबूर येथे झाडाची फांदी शाळेच्या बसवर कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारची दुर्घटना शहादा शहरात घडू नये, यासाठी नगरपालिका प्रशासन आणि वन विभागाने संयुक्तपणे तातडीने पाहणी करून धोकादायक फांद्यांची छाटणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील धोकादायक फांद्यांचे सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
“शहादा शहरातील मुख्य रस्त्यांवरील झाडांच्या रस्त्यावर झुकलेल्या फांद्या वाहतुकीस अडथळा ठरत असून अपघाताचा धोका वाढला आहे. पावसाळ्यात या फांद्या तुटून वाहनांवर किंवा पादचाऱ्यांवर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगरपालिका प्रशासन आणि वन विभागाने संयुक्तपणे तातडीने छाटणी करावी.”
— ईश्वर पाटील, अध्यक्ष, शहादा तालुका प्रवासी महासंघ
