बुलढाणा | प्रतिनिधी :
बुलढाणा जिल्ह्यात अवैध धंदे, व्यसनाधीनता आणि गुन्हेगारीविरोधात प्रभावी मोहीम राबविणारे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलेश तांबे यांच्या संकल्पनेतील ‘मिशन परिवर्तन’ हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात लागू करावा, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक तसेच अमरावती परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे केली आहे.
या मागणीसाठी वारकरी धर्म परिषद, सन्मान स्वतंत्र कामगार संघटना, ग्राम स्वराज्य समिती, आझाद हिंद संघटना, रमाई ब्रिगेड, किसान ब्रिगेड, मातृतीर्थ रणरागिनी संघटना आणि महानायक विचारमंच आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत निवेदने तसेच ई-मेलद्वारे पाठपुरावा केला आहे.
‘मिशन परिवर्तन’ची प्रभावी अंमलबजावणी
डॉ. निलेश तांबे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत व्यसनमुक्त आणि अवैध व्यवसायमुक्त जिल्हा निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम, पथनाट्य, विशेष पोलीस पथके, पालक-शिक्षक संवाद, गुटखा बंदी आणि निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांवर नियंत्रण यांसारख्या उपाययोजना राबविण्यात आल्या.
या उपक्रमांमुळे जिल्ह्यात सकारात्मक बदल होत असल्याचा दावा विविध संघटनांनी केला असून, जनसामान्यांमध्ये डॉ. तांबे यांची ‘कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक’ म्हणून प्रतिमा निर्माण झाली आहे.
सामाजिक संघटनांचा पाठिंबा
वारकरी हभप विलास महाराज वाघमारे, शेख युनूस, योगेश कोकाटे, विजय साबळे पाटील, अशोक बाहेकर, पंचफुलाबाई गवई, सिद्धार्थ वानखेडे, भारती अवचार आणि गणेश पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ‘मिशन परिवर्तन’ राज्यभर राबविण्याची मागणी केली आहे.
बुलढाणा पॅटर्नची चर्चा
यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी महसूल विभागातील ई-सेवा प्रणाली प्रभावीपणे राबवून ‘मातृतीर्थ बुलढाणा पॅटर्न’ राज्यभर चर्चेत आणला होता. त्याच धर्तीवर आता डॉ. निलेश तांबे यांचे ‘मिशन परिवर्तन’ही महाराष्ट्रात लागू होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


