प्रतिनिधी :
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सन २०२५-२६ च्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अत्यंत ज्वलंत पीकविमा प्रश्नावर सभागृहात प्रभावीपणे आवाज उठविला.
यवतमाळ हा आत्महत्याग्रस्त जिल्हा असून, यावर्षी सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीतही जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीकविमा योजनेपासून वंचित राहिल्याचा गंभीर मुद्दा त्यांनी सभागृहात उपस्थित केला. जिल्ह्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला तातडीने पीकविम्याचा लाभ देण्यात यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
यासोबतच खराब CIBIL स्कोअरमुळे अनेक शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नसल्याने शासनाने बँकांना लेखी सूचना देऊन अशा शेतकऱ्यांनाही कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
तसेच सन २०१८-१९ मध्ये पांढरकवडा येथे कृषी महाविद्यालय मंजूर करण्याचे देण्यात आलेले आश्वासन पूर्ण करून तातडीने कृषी महाविद्यालयास मंजुरी द्यावी, अशी विनंती त्यांनी माननीय कृषी मंत्र्यांकडे सभागृहात केली.
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत असल्यामुळे आमदार राजूभाऊ तोडसाम यांच्या भूमिकेचे शेतकरी वर्गातून स्वागत करण्यात येत आहे.



