पुरंदर | प्रतिनिधी :
हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मौजे काळेवाडी (दिवे) येथे कृषी दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पुरंदर आणि पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम मंदिर, काळेवाडी येथे आयोजित कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सभापती अमित झेंडे यांनी भूषविले. यावेळी हरिभाऊ लोळे, अजय इंगळे, स्मिता निगडे, गटविकास अधिकारी सुरेश थोरात, महेंद्र गिरमे, अनिल दुर्गुडे, मयूर कचरे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत अंजीर पिकाचा समावेश झाल्याची माहिती दिली. अंजीर पिकासाठी प्रति हेक्टर १६ लाख रुपयांची विमा संरक्षित रक्कम आणि ८ हजार रुपये विमा हप्ता निश्चित करण्यात आल्याचे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी विमा घेण्याचे आवाहन केले. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
अंजीर व सीताफळ संशोधन केंद्राचे डॉ. प्रदीप दळवे यांनी हिरवळीचे खत, सेंद्रिय घटक आणि जमिनीची सुपीकता वाढविण्याचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच अंजीर पिकासाठी योग्य बहार व्यवस्थापनाबाबत माहिती दिली.
डॉ. युवराज बालगुडे यांनी सीताफळ व अंजीर पिकातील कीड व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करत एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे महत्त्व सांगितले. कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे शास्त्रज्ञ दीपक गावडे यांनी हवामान बदल, एल निनोचा परिणाम, कमी पावसाच्या परिस्थितीत पीक व्यवस्थापन आणि बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.
बँक ऑफ महाराष्ट्रचे कृषी अधिकारी उमेश निकम यांनी शेतीपूरक व्यवसाय, महिला बचत गट प्रशिक्षण आणि शेतकरी कर्ज योजनांची माहिती दिली. प्रगतशील शेतकरी अतुल सस्ते यांनी रुंद वरंबा आणि सरी (BBF) तंत्रज्ञान पद्धतीची माहिती देत आधुनिक लागवड तंत्राचे प्रात्यक्षिक सादर केले.
कार्यक्रमादरम्यान खरीप हंगाम २०२५-२६ मधील पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच बोपगाव व दिवे येथील पाणी फाउंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गटांचाही गौरव करण्यात आला.
हरिभाऊ लोळे यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास पुरंदर तालुक्यातील उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, माजी सरपंच योगेश काळे, महिला शेतकरी, प्रगतशील शेतकरी तसेच कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभवातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश जगताप यांनी केले तर आर. डी. खेसे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण, रविंद्र खेसे, गणेश जगताप आणि सासवड मंडळ कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

