खारपाडा, पेण प्रतिनिधी : खारपाडा गावचे सुपुत्र प्रशांत कांतीलाल घरत यांनी राष्ट्रीय स्तरावरील पखवाज सोलो वादन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे खारपाडा गावासह रायगड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाले आहे.
दि. २८ जून २०२६ रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ (पिंपरी चिंचवड महानगरपालिका) आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गांधर्व मंच’ राष्ट्रीय स्तरावरील भारतीय शास्त्रीय संगीत, संत रचित अभंग गायन तसेच पखवाज-तबला वादन स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेतील पखवाज सोलो वादन प्रकारात पंडित मृणाल मोहन उपाध्याय (दिल्ली) यांचे शिष्य प्रशांत कांतीलाल घरत यांनी आपल्या बहारदार वादनाने परीक्षक आणि रसिकांची दाद मिळवत देशात द्वितीय क्रमांक मिळवला. त्यांनी पं. वासुदेव उपाध्याय परंपरा (गया घराणा) या विभागात हे यश मिळवले.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना विशेष प्रमाणपत्र, आकर्षक चषक आणि ३५ हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. हा सन्मान माजी मुख्यमंत्री Sharad Pawar, खासदार Shrirang Barne, अवधूत गुप्ते आणि सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
प्रशांत घरत यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

