परतूर प्रतिनिधी :
परतूर शहरात नगरपरिषदेच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या समस्यांमुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत. शहरातील अनेक भागांत आठ-आठ दिवस नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
“धरण उशाला आणि कोरड घशाला” अशी परिस्थिती शहरात निर्माण झाल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने अनेक भागांतील नागरिकांना टँकर किंवा इतर पर्यायांवर अवलंबून राहावे लागत आहे.
दरम्यान, शहरातील स्वच्छतेच्या कामांबाबतही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्वच्छता कर्मचारी केवळ नावालाच काम करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून अनेक रस्ते आणि नाल्या घाणीने तुडुंब भरल्याचे चित्र आहे. पाऊस पडल्यानंतर नाल्यांतील घाण रस्त्यावर येत असून ती साफ करण्यासाठी वेळेवर कर्मचारी येत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
काही नागरिकांनी कार्यालयीन कर्मचाऱ्यांवरही गंभीर आरोप करत, “पैसे घेतल्याशिवाय कामे होत नाहीत,” असा आरोप केला आहे. तसेच नगरसेवक वार्डात फिरकत नसल्याचीही नाराजी व्यक्त करण्यात आली.
शहरातील सर्वच वार्डांमध्ये अशाच प्रकारची परिस्थिती असून प्रशासनाने तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा येणाऱ्या काळात सत्ताधाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
परतूरचे आमदार बबनराव लोणीकर तसेच राहुल लोणीकर यांनी या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शहरवासीयांकडून करण्यात येत आहे.
