तेल्हारा प्रतिनिधी :
पिवंदळ बु. परिसरात सध्या वन्यप्राण्यांनी उच्छाद मांडला असून शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. पेरणी केलेली पिके वन्यप्राण्यांकडून उद्ध्वस्त केली जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी रानडुकरे, हरिण आणि रोही यांसारखे वन्यप्राणी शेतात घुसून पिकांची नासधूस करत आहेत. नुकतीच उगवलेली पिके आणि पेरणी केलेली शेती या प्राण्यांमुळे धोक्यात आली आहे.
पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना पावसाळ्यातही रात्री जागून शेतात गस्त घालावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याबरोबरच सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अनेकांना एकटे शेतात जाणेही धोकादायक वाटत आहे.
या परिस्थितीमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी वनविभागाने तातडीने लक्ष घालून विशेष मोहीम राबवावी आणि वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली आहे.
