मुंबई
सरोदे समाज उन्नती मंडळ मुंबई, राजर्षी शाहू महाराज संस्कार केंद्र व भटके विमुक्त जाती जमाती विकास परिषद (अखिल भारतीय) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ जून २०२६ रोजी बोरिवली पूर्व येथील फुलपाखरू उद्यानातील शैलजा विजय गिरकर सभागृहात राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त भटक्या विमुक्तांचा मेळावा तसेच दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात पार पडला.
दीपप्रज्वलन आणि श्री मंगेश शिंगे यांच्या वैयक्तिक गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून भटके विमुक्त जाती जमाती विकास परिषद (अखिल भारतीय) चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री दादा इदाते उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात राजर्षी शाहू महाराजांनी दलित, वंचित आणि मागासवर्गीय समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला.
यावेळी संघटनेचे राष्ट्रीय कार्यवाह अनिल फड यांनी राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देत त्या सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अशोक कांबळे, बबनराव मोहिते, चंद्रकांत शिंदे, रश्मी जाधव, सोनम नायर, अशोक वाडेकर, अरविंद गोसावी, अर्चना लष्कर, विनोद गोसावी, सुदाम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दहावी आणि बारावीमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या १२२ विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये ९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले असून एका विद्यार्थिनीने तब्बल ९७.२० टक्के गुण मिळवून विशेष यश संपादन केले.
कार्यक्रमादरम्यान नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच या मागण्यांसंदर्भात शासनाकडे निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सहदेव रसाळ यांनी भूषविले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदेश भागवत, संदेश रसाळ, सुजित गोसावी आणि राहुल भुसारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीधर साळुंके यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
