धडगाव | प्रतिनिधी
नगर जिल्ह्यातील भानसहीवरे येथील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, शैक्षणिक सुविधा आणि सुरक्षित वातावरण मिळत नसल्याचा आरोप करत अक्कलकुवा, तळोदा आणि धडगाव तालुक्यातील पालकांनी गुरुवारी तळोदा येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
संबंधित विद्यार्थ्यांचे तातडीने दुसऱ्या नामांकित शाळेत समायोजन करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी पालकांनी केली. प्रकल्प प्रशासनाने मागण्यांवर वरिष्ठ स्तरावर तातडीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
तळोदा आदिवासी विकास प्रकल्पामार्फत सुमारे २०० विद्यार्थ्यांना भानसहीवरे येथील शाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षणासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, शैक्षणिक गुणवत्ता, वसतिगृह व्यवस्था, भोजन, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि इतर मूलभूत सुविधांबाबत गंभीर त्रुटी असल्याचा आरोप पालकांनी केला.
या प्रकरणी प्रकल्प प्रशासनाने संबंधित संस्थेला नोटीस बजावत चौकशी केली असून आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, नाशिक आदिवासी विभागाचे उपायुक्त दिनकर पावरा यांनी मोबाईलद्वारे पालकांशी संवाद साधून समायोजनाबाबत पालकांनी स्वतंत्र अभिप्राय सादर करावा, त्यावर तातडीने निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
पालकांचे निवेदन प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांच्या समायोजनाबाबत वरिष्ठांकडे तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे सहाय्यक प्रकल्प अधिकारी डी. आर. मुंगळे यांनी सांगितले.
“आमच्या मुलांची शासन आणि प्रशासनाने आबाळ करू नये. या शाळेतील शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची स्थिती गंभीर आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन त्यांचे तातडीने दुसऱ्या नामांकित शाळेत समायोजन करण्यात यावे,” अशी मागणी पालकांनी केली.
