धामणी (ता. शहापूर, जि. ठाणे) : धामणी गावातील रेल्वे ब्रिजखालील रस्ता पावसामुळे अत्यंत खराब झाला असून सर्वत्र चिखल आणि पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांसह पादचाऱ्यांनाही या मार्गावरून ये-जा करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
रेल्वे ब्रिजखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने तसेच रस्ता पूर्णपणे चिखलमय झाल्याने वाहनचालकांना वाहने घसरून अपघात होण्याची भीती सतावत आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्ग आणि ग्रामस्थांना दररोज या समस्येचा सामना करावा लागत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या समस्येबाबत अनेक वेळा संबंधित प्रशासन आणि विभागाचे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र, अद्याप कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. पावसाळ्यात परिस्थिती अधिक बिकट होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांनी संबंधित विभागाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून पाणी निचऱ्याची योग्य व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही नागरिकांनी सांगितले.
