
मानवत | प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त मानवत बसस्थानकात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हरित भविष्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याच्या उद्देशाने आयोजित या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत मंगळवारी (दि. १४ जुलै) शालेय विद्यार्थिनीच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या संतवचनाचे स्मरण करत “पर्यावरण समृद्धीची आणि आपली एसटी प्रगतीची” हे ब्रीद समोर ठेवून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले तसेच अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला एसटी महामंडळाचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक धोंडीराम जाधव, वाहतूक नियंत्रक मारोती परांडकर, पत्रकार संजय नाईक, प्रा. मोहन बारहाते, कचरुलाल बारहाते, मुंजा कापसे, राजू कापसे, राजेभाऊ ढालकरी, अजित वाल्मिक यांच्यासह महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या रोपांचे संगोपन, नियमित देखभाल आणि संवर्धन करण्याचा संकल्पही करण्यात आला. प्रत्येकाने आपल्या परिसरात वृक्ष लागवड करून त्यांचे जतन करावे, असे आवाहन मान्यवरांनी केले.
या उपक्रमामुळे मानवत बसस्थानक परिसर अधिक हिरवागार होण्यास मदत होणार असून पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृतीसही चालना मिळेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

