परभणी | प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय घेत विभागीय आयुक्तांनी पीक विमा कंपनीने दाखल केलेले सर्व आक्षेप (डिस्पूट) फेटाळून लावले आहेत. तसेच जिल्हाधिकारी, परभणी यांनी सादर केलेला अहवाल मान्य केल्याने जिल्ह्यातील १७ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयामुळे जांब, परभणी ग्रामीण, परभणी शहर, पेडगाव, पिंगळी, सिंगणापूर, टाकळी कुंभकर्ण, झरी, पिंपळदरी, राणीसावरगाव, पेठशिवणी, चुडावा, कावलगाव, लिमला, आवलगाव, सोनपेठ आणि वडगाव या महसूल मंडळांतील पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या निर्णयानंतर विभागीय आयुक्त श्री. जी. श्रीकांत यांची भेट घेऊन निर्णयाची माहिती घेण्यात आली. यावेळी एकनाथराव साळवे, विलासराव बाबर, रामभाऊ अरगडे यांच्यासह शिष्टमंडळ उपस्थित होते.
यापूर्वी कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी यांच्या अहवालानुसारच पीक विमा मंजूर करण्याची भूमिका मांडण्यात आली होती. त्याच भूमिकेला मान्यता देत विभागीय आयुक्तांनी विमा कंपनीचे सर्व आक्षेप फेटाळले.
दरम्यान, सदर अहवाल पुढील कार्यवाहीसाठी कृषीमंत्री, कृषी आयुक्त आणि प्रधान सचिव (कृषी) यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच सन २०२४ मधील दैठणा, टाकळी कुंभकर्ण आणि रावराजूर महसूल मंडळांतील प्रलंबित पीक विमा प्रकरणांबाबतही शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
या निर्णयामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, पीक विम्याच्या प्रश्नावर हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.



