जालना | प्रतिनिधी
जालना तालुक्यातील निसर्गरम्य हिवरा तपेश्वर परिसरातील श्री क्षेत्र विठ्ठल माळ येथे आषाढी एकादशीनिमित्त मंदिर समितीने जय्यत तयारी केली आहे. चोहोबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेल्या या पवित्र क्षेत्रावर वैकुंठवासी म्हातार बाबा शिंदे खणेपुरीकर यांच्या प्रेरणेने उभारलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात यंदा हजारो भाविक दर्शनासाठी येण्याची अपेक्षा आहे.
यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे पंचक्रोशीतील ३० ते ३५ गावांमधून निघणाऱ्या वारकरी दिंड्या. हिवरा तपेश्वर, खणेपुरी, भाटेपुरी, वानडगाव, थेरगाव, पाचनवडगाव, हिस्वण, माळी पिंपळगाव, कारला, हातवन, वडीवाडी, ममदाबाद, बापकळ, रामनगर, हदप सावरगाव, सिंधी, काळेगाव, कचरेवाडी, मौजपुरी, उटवद, धांडेगाव, डुकरी पिंपरी, खोडेपुरी, घोडेगाव, सोलगव्हाण, सोमनाथ जळगाव, पिरकल्याण तसेच जालना शहरासह विविध वस्त्या-तांड्यांमधून वारकरी मोठ्या उत्साहात सहभागी होणार आहेत.
शनिवार, २५ जुलै रोजी पहाटेपासून अभिषेक, काकड आरती, भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताह आणि महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात शेड, पिण्याच्या पाण्याची तसेच फराळाची व्यवस्था करण्यात आली असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मौजपुरी पोलिस ठाण्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, श्री क्षेत्र विठ्ठल माळ हे गावापासून सुमारे ५ ते ६ किलोमीटर अंतरावर असून मंदिरापर्यंत अद्याप पक्का रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे भाविकांना खडतर मार्गाने प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिरापर्यंत लवकरात लवकर पक्का रस्ता उभारण्याची मागणी वारकरी आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


