
धडगाव : प्रतिनिधी
मोराणे (धुळे) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिनानिमित्त विचारप्रबोधन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. समता शिक्षण संस्था, पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स (मास्वे) यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने समाजकार्य पंधरवड्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून संदिप देवरे, यंग फाउंडेशनचे सामाजिक कार्यकर्ते, धुळे, उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर, प्रा. डॉ. रघुनाथ महाजन, प्रा. डॉ. राहुल आहेर, प्रा. डॉ. सुदाम राठोड, प्रा. डॉ. मेघावी मेश्राम, प्रा. डॉ. प्रिती वाहने, प्रा. डॉ. सुवर्णा बर्डे, प्रा. डॉ. फरिदा खान तसेच ग्रंथपाल गजेंद्र जगदेव उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक संदिप देवरे यांनी विद्यार्थ्यांना ‘जाती सलोखा आणि सामाजिक शांतता’ या विषयावर मार्गदर्शन केले. आजच्या काळात जातीयवाद, धार्मिक तेढ, द्वेष आणि भेदभाव यांसारख्या समस्या समाजासमोर आव्हान ठरत आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने इतरांच्या भावना व विचारांचा आदर करणे गरजेचे आहे. मतभेद असले तरी मनभेद होऊ नयेत, यासाठी संवाद, सहकार्य आणि परस्पर सन्मानाची भावना आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ यांनी सद्भावना ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता ती प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाली पाहिजे, असे सांगितले. सर्वांनी एकमेकांना मदत करून, भेदभाव टाळून आणि प्रेम व बंधुभावाने वागल्यास देशाची एकता व सामाजिक सलोखा अधिक मजबूत होईल, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. डॉ. राहुल आहेर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सुदाम राठोड यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील एसवाय बीएसडब्ल्यू आणि एफवाय बीएसडब्ल्यूचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागप्रमुख प्रा. डॉ. राहुल आहेर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



