शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम तहसीलदार उदय गायकवाड यांचे हस्ते संपन्न…
.प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर. सारथी महाराष्ट्राचा न्युज.
वृत्तसेवा :-कुरुंदवाड/ शालेय विद्यार्थ्यांनी जीवनात कोणताही पेशा स्वीकारला तरी एक चांगला माणूस म्हणून जगले पाहिजे. यासाठी चांगल्या आचाराची विचाराची गरज आहे. शिक्षणामुळे माणसं शहाणी झाली. परंतु चंगळवादी संस्कृतीमध्ये तो संस्कृती पासून दूर जाऊ लागला आहे. त्यामुळे शालेय वयातच विद्यार्थ्यांवर संस्कार होणे आज काळाची गरज आहे. असे प्रतिपादन येथील सिंधुदुर्गचे सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे तहसीलदार उदय बाळासाहेब गायकवाड यांनी केले.
आलास ता शिरोळ येथील कलाश्री बा.ग.पवार ए.बी. हायस्कूलच्या शैक्षणिक व शिष्यवृत्ती साहित्य वितरण कार्यक्रमात समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी नंदकुमार सुतार होते. ते पुढे म्हणाले की, धावपळीच्या जगात माणसाचे जीवन यंत्रासारखे झाले आहे. बदललेल्या जीवनशैलीमूळे मानसिक आजारांचा विळखा माणसाभोवती पडला आहे. चंगलवादी संस्कृती, इंटरनेटचा जमाना व मोबाईलमुळे माणसातला संवाद खुंटला आहे. त्यामुळे समज, गैरसमज यामुळे माणसे एकमेकांंपासून दूर जात आहेत.
मोबाईलच्या जमान्यामध्ये आजची पिढी वेगाने पुढे सरकत असून सर्वच क्षेत्रात अनेक विद्यार्थी चमकू लागले आहेत. लहानपणापासून संगीत, नृत्य, क्रीडा अशा सर्वच प्रकारात पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष केंद्रित केल्याने आजची लहान चिमुकली ही स्पर्धेत उतरत आहेत. शिक्षकांनी मुलांना मार्गदर्शन करताना जिज्ञासा ठेवली पाहिजे. विद्यार्थ्यांची भौगोलिक, आर्थिक परिस्थिती वेगळी असते. जीवनात कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही.
शिक्षकाला समाजात महत्त्व आहे. प्रशासनापेक्षा शिक्षकीपेक्षा महत्त्वाचा असून शिक्षक चुकला तर विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होते. सामाजिक जीवनात काम करताना विनयशीलता नसेल तर विद्येला काही किंमत नाही. जगाच्या बाजारपेठेत विद्यार्थ्यांनी कसे वागायचे याचं शिक्षण देऊन मुलांना बोलायला शिकवले पाहिजे. मुले ही देशाची संपत्ती आहे. ती सक्षम झाली तरच देश सक्षम होईल. त्यांना सक्षम करणे आज काळाची गरज आहे. समाजामध्ये विघातक प्रवृत्ती वाढली आहे. त्यामुळे लहान वयातच विद्यार्थ्यांवर संस्कार केले पाहिजेत. यावेळी सदानंद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी स्वागत प्रभारी मुख्याध्यापक सुभाष कोळेकर यांनी प्रास्ताविक हरित सेनेचे संचालक सतीश माने यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सहदेव केंगाळे यांनी करून दिला. पाहुण्यांचा सत्कार मुख्याध्यापकांच्या हस्ते करण्यात आला तर पाहुण्यांच्या हस्ते सहदेव केंगाळे यांच्या मानधन देणगीतून शैक्षणिक पुस्तके व शिष्यवृत्ती मार्गदर्शकेचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पाटील यांनी तर शेवटी आभार प्रकाश चाटे यांनी मानले.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षक रफिक मखमल्ला, सुनिता जोंग दत्ता धुमाळ अनिल शिंदे गोपाळ मोरे यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










