
“भूमी हिरावू देणार नाही, वेळ आली तर लढा उग्र होईल”**
आजरा :प्रतिनिधी
परभणी येथे शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीदरम्यान शेतकरी महिला-पुरुषांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आजरा येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून भांडवलदारांच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत, शक्तीपीठ प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असा ठाम निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.
या आंदोलनात श्रमिक मुक्ती दलचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, शेतकरी संघटनाचे अध्यक्ष तानाजी देसाई, काँग्रेसचे संजयभाऊ सावंत यांच्यासह संजय तर्डेकर, प्रकाश मोरुस्कर, कॉ. शांताराम पाटील आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना कॉ. संपत देसाई म्हणाले, “माती ही आमच्यासाठी केवळ जमीन नाही तर आईसमान आहे. तिच्यावर हात टाकाल तर शेतकरी शांत बसणार नाही. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असा आदेश देणाऱ्या राजाच्या जयंतीनंतर लगेचच शेतकरी स्त्री-पुरुषांवर लाठीचार्ज होणे हे महाराष्ट्राच्या इतिहासाला काळिमा फासणारे आहे.”
शेतकरी संघटनेचे नेते तानाजी देसाई म्हणाले, “शिवजयंतीच्या दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांवर अन्याय करणारे सरकार कोणत्या विचारधारेचे आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. शेतकरी नव्हे तर भांडवलदारांचे हित जपण्यासाठीच शक्तीपीठ लादले जात आहे.”
आंदोलनाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी “वेळ आली तर रक्त सांडू, पण शेतकऱ्यांना भूमिहीन होऊ देणार नाही” असा एकच सूर आंदोलकांमध्ये दिसून आला.
यावेळी रवी भाटले, काशिनाथ मोरे, दशरथ घुरे, भीमराव माधव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.





