
आजरा: (प्रतिनिधी)
आजरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणांहून गहाळ झालेल्या १० नागरिकांचे मोबाईल शोधण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. शोध घेतलेले हे सर्व मोबाईल आज कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले. आपले हरवलेले महागडे फोन परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
नेमकी कारवाई काय?
आजरा पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गहाळ मोबाईल तक्रारींच्या अनुषंगाने पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला होता. केंद्र सरकारच्या CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलवर गहाळ मोबाईलची माहिती भरून त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. या तंत्रज्ञानाच्या मदतीने हे मोबाईल ज्या व्यक्तींकडे होते, त्यांचा शोध घेऊन ते पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले.
मोबाईल परत मिळालेले नागरिक:
या मोहिमेअंतर्गत रमेश धोंडीबा पोतनीस (सातेवाडी), प्रभाकर यल्लाप्पा कोरवी (आजरा), महादेव विष्णू होरटे (मासेवाडी), प्रफुल्ल राजेंद्र खणगावकर (तारेवाडी), ऋषिकेश सदाशिव पाटील (हनिमनाळ), प्रथमेश अविनाश येसादे (उत्तूर), स्वप्नील रमेश सावरतकर (खेडे), प्रकाश गुंडू तेऊरवाडकर (गांधीनगर, आजरा), विवेक नागोजी कोलेकर (बोलकेवाडी) आणि सुरेश सिद्धू पेडणेकर (सुळे) या १० जणांना त्यांचे मोबाईल परत मिळाले आहेत.
यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई:
कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक श्री. अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी (गडहिंग्लज विभाग) श्री. रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि श्री. नागेश यमगर यांनी ही मोहीम राबवली.
या कारवाईत पोलीस अंमलदार ओंकार आनंदराव पाटील (पोकॉ १८९७) यांनी तांत्रिक बाबींचा वापर करून मोबाईल शोधण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.
आवाहन: आपला मोबाईल गहाळ झाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात नोंद कर.





