
ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक परिसर स्टेशन एरिया डेव्हल्पमेन्ट अलाँग द मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल काॅरिडोअर (स्मार्ट) अंतर्गत विकास करण्यात येणार आहे.
यासाठी केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्था (जायका) यांच्या मदतीने यासाठी एमएमआरडीएकडून विकास आराखडा तयार केला जाणार आहे. स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत स्थानक परिसरात प्रवाशांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.
मुंबई-अहमदाबाद अंतर केवळ दोन ते अडीच तासात पार करता यावे यासाठी नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम सध्या वेगात सुरू आहे.
अंदाजे ५०८ किमीच्या या मार्गात एकूण १२ स्थानकांचा समावेश आहे. यातील चार बुलेट ट्रेन स्थानके महाराष्ट्रात आहे. बीकेसी, ठाणे, विरार आणि पालघर अशी ही चार स्थानके आहेत.
बुलेट ट्रेन कार्यान्वित झाल्यानंतर स्थानक परिसरात प्रवाशांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. त्यानुसार आता बुलेट ट्रेन स्थानक परिसराच्या एकात्मिक विकासासाठी एमएमआरडीएने पुढाकार घेतला आहे. ठाणे आणि विरार या दोन स्थानक परिसराचा पहिल्या टप्प्यात विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर बीकेसी आणि पालघर स्थानक परिसराचाही ठाणे-विरार स्थानकांच्या धर्तीवर विकास करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएने दिली.
ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक परिसराचा विकास कसा साधायचा हे ठरविण्यासाठी नुकतीच एमएमआरडीएच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील कार्यालयात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या आणि जायकाच्या अधिकाऱ्यांनी, तज्ज्ञांनी या कार्यशाळेस हजेरी लावली.
यावेळी जायका आणि केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या मदतीने स्थानक परिसर विकासासाठी विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच हा आराखडा तयार करून स्थानक परिसराचा विकास मार्गी लावला जाणार आहे. स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत ठाणे आणि विरार स्थानक परिसरात वाहनतळ, रिक्षा, टॅक्सी स्टॅन्ड, बस थांबा यासह अन्य सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.



