कणकवली प्रतिनिधी | दि. ०१ मार्च २०२६ :
मुंबई ते कोकण (विजयदुर्ग) दरम्यान सुरू करण्यात आलेली M2M रो-रो (रो-पॅक्स) जलवाहतूक सेवा आज मुंबईहून कोकणाच्या दिशेने उत्साहात रवाना झाली. मुंबईतील भाऊचा धक्का येथे या सेवेचा उद्घाटन सोहळा पार पडला.
या रो-रो जहाजाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी हिरवा झेंडा दाखवून सेवेला शुभारंभ केला. या वेळी स्थानिक नागरिक, कोकणवासीय तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
मुंबई ते विजयदुर्ग दरम्यानची ही रो-पॅक्स सेवा प्रवासी आणि वाहनांसाठी सोयीची ठरणार आहे. रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करून वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.
या सेवेच्या पहिल्याच फेरीला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून भविष्यात ही रो-पॅक्स सेवा मुंबई-कोकण वाहतुकीचा एक मुख्य आणि विश्वासार्ह पर्याय ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
कोकणातील पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.





