पंचगंगा नदीपात्रात रसायनयुक्त सांडपाणी आल्याने जलपर्णीचा विळखा…..
प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर. सारथी महाराष्ट्राचा न्युज.
कुरुंदवाड :- पंचगंगा नदीपात्रात पुन्हा रसायनयुक्त सांडपाणी आल्याने नदी प्रदूषित झाली आहे.पाण्याला फेस येत आहे.पाण्याचा रंग बदलला आहे.नदी काठावर दुर्गंधी सुटली असून शेतीला पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यातून संताप व्यक्त होत आहे.तर जलपर्णीने पंचगंगा नदीचा परिसर व्यापला आहे. तिला हिरवेगार मैदानाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे पंचगंगेचे हे स्वरूप कधी बदलणार असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
पंचगंगा नदीत रसायनयुक्त पाणी आले आहे. त्यावर जलपर्णीने विळखा घातला आहे. पाण्याला औद्योगिक वसाहतीतील प्रोसेसच्या रासायनिक पाण्यासारखा काळपट-हिरवट रंग येत असून पाण्याला फेस येत आहे.
अब्दुललाट, शिरढोण, हेरवाड, तेरवाड, नांदणी, धरणगुत्ती, हरोली, शिरोळ या गावच्या पाणी योजना पंचगंगा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. प्रदूषित पाणी आल्याने या गावच्या ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच परिसरातील हजारो एकर आधारित शेती क्षारपड होण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. प्रत्येक वर्षी नदीकाठच्या ग्रामस्थांना प्रदूषित पाण्याचा सामना करावा लागतो. तर वारंवार नदीचे प्रदूषण हे सुरूच आहे.
प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने, प्रदूषण नियंत्रण मंडळाबद्दल नाराजीचा सुर उमटत आहे.राज्य सरकारने याबाबत कठोर भूमिका घेतली मात्र राज्य सरकारचा आदेश धाब्यावर बसवित प्रदूषित घटकांनी प्रदूषणाची सीमा ओलांडली आहे.तर प्रदूषण नियंत्रण मंडळाने झोपेचे सोंग घेतल्याने न्याय मागायचा कुणाकडे असा सवाल ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
प्रदूषण प्रश्नी प्रदूषण नियंत्रण मंडळाशी अनेकवेळा चर्चा करूनही शिरोळ तालुक्याच्या जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून कोणतीच उपाय योजना त्यांनी राबवलेली नाही.प्रशासनने याबाबत ठोस उपाय योजना राबवून प्रदूषित घटकांवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालीघाटे यांनी केली आहे.










