

लोणी प्रतिनिधी:- तेजस वाळुंज
धामणी (ता. आंबेगाव) : आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनच्या प्रलंबित प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धामणी येथे शेतकऱ्यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. अनेक वर्षांपासून या भागातील शेतकरी पाण्याअभावी अडचणीत असून शेतीसाठी पुरेशा पाण्याची सुविधा नसल्याने शेतीचे मोठे नुकसान होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या समस्येवर उपाय म्हणून धामणी व पहाडदरा परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत डिंभा धरणाच्या उजव्या कालव्यावरून सुमारे तीन ते सात किलोमीटर अंतरावरून तब्बल नऊ पाईपलाईन टाकण्याचा मोठा उपक्रम राबवला आहे. शेतीला बारमाही पाणी मिळावे आणि बागायती शेतीचा विकास व्हावा या उद्देशाने शेतकऱ्यांनी शासनाची कोणतीही आर्थिक मदत न घेता स्वतःच्या खर्चातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून ही योजना उभारली आहे. या योजनेसाठी अनेक शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज घेतले असून काहींनी आपले सातबारा गहाण ठेवून निधी उभारला आहे. मोठ्या अपेक्षेने आणि मेहनतीने उभारलेली ही पाईपलाईन योजना आता वीज कनेक्शनअभावी रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असले तरी पाणी उचलण्यासाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा मिळत नसल्याने संपूर्ण योजना अडचणीत आली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शासनाकडून सोलर पंपाचा पर्याय सुचविला जात आहे; मात्र सोलर पंपातून अपेक्षित क्षमतेने वीज उपलब्ध होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी उचलणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतीसाठी आवश्यक असलेला पाणीपुरवठा होत नाही आणि शेतकऱ्यांनी केलेली कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक धोक्यात येत आहे.
सध्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिकच चिंताजनक ठरत आहे. जर वेळेत वीज कनेक्शन मिळाले नाही, तर उभारलेली संपूर्ण पाईपलाईन योजना वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर धामणी येथे शेतकऱ्यांनी एकत्र येत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले असून शासनाने तातडीने लक्ष घालून या योजनेसाठी वीज कनेक्शन मंजूर करावे, अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.




