अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहिल्यानगर महानगरपालिकाच्या सार्वत्रिक निवडणुका होऊन आता तब्बल महिना उलटून गेला आहे. महानगरपालिकेतील महापौर, उपमहापौर तसेच विविध विषय समित्यांच्या निवड प्रक्रियाही पूर्ण झाल्या आहेत. निवडून आलेल्या नगरसेवकांचा विविध ठिकाणी सत्कार समारंभ आणि अभिनंदन कार्यक्रमांचा सिलसिला अजूनही सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे.
मात्र आता नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. “सत्कार समारंभ पुरे, आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा.” असे नागरिकांचे स्पष्ट मत आहे. निवडणुकीच्या काळात पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, कचरा व्यवस्थापन, नालेसफाई, स्ट्रीट लाईट्स, तसेच वाढती अनधिकृत बांधकामे यांसारखे प्रश्न प्रमुख होते. अनेक प्रभागांमध्ये अजूनही मूलभूत सुविधांबाबत तक्रारी कायम आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे की, निवडणुकीत दिलेली आश्वासने आता प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आली आहे.
काही भागांमध्ये पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेणे गरजेचे आहे. तसेच पाणीपुरवठा नियोजन आणि कचरा निर्मूलन व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे. “आम्ही विश्वासाने मतदान केले आहे. आता आमच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा,” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
स्थानिक सामाजिक संघटनांनीदेखील नव्या पदाधिकाऱ्यांनी प्रभागनिहाय बैठका घेऊन नागरिकांच्या अडचणी ऐकाव्यात आणि कामांचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी केली आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राहिल्यास शहराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास जाणकार व्यक्त करत आहेत. दरम्यान, काही नगरसेवकांनी लवकरच प्रभागभेटी घेऊन कामांची प्राधान्यक्रम यादी जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. येत्या काही आठवड्यांत प्रत्यक्ष कामांना सुरुवात होते का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करून विकासाची गती वाढवणे, ही नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीं समोरील खरी कसोटी ठरणार आहे.











