जालना जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभिनव उपक्रमास सुरुवात
शेतकऱ्यांच्या प्रलंबित महसुली प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही समस्या शिबिरस्थळीच निकाली काढा – आमदार बबनराव लोणीकर
परतूर तालुक्यातील आष्टी आणि मंठा तालुक्यातील वायाळ पांगरी येथून शिबिरास सुरुवात
आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभ हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत आष्टी आणि गोसावी पांगरीत उदघाटन संपन्न
परतूर/मंठा, दि. ७ मार्च : नागरिकांच्या महसुली व प्रशासकीय समस्या गावपातळीवरच सोडविण्यासाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ या अभियानाची सुरुवात जालना जिल्ह्यात आज (दि.७ मार्च) करण्यात आली. या शिबिरांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ पोहोचविण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
परतूर तालुक्यातील आष्टी मंडळातील खंडेश्वर मंदिर, आष्टी तसेच मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी मंडळातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पांगरी गोसावी येथे आज शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही शिबिरांचे उद्घाटन भाजपा नेते, माजी मंत्री तथा परतूर–मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी उपस्थित हजारो नागरिकांना मार्गदर्शन करताना आमदार लोणीकर म्हणाले की, महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा या शिबिरांचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांच्या प्रलंबित महसुली प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करून शक्य तितक्या समस्या शिबिरस्थळीच निकाली काढाव्यात, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
जमीन नोंदी, फेरफार, वारसा नोंद, उत्पन्न व जातीचे दाखले, तसेच विविध शासकीय योजनांबाबतची माहिती आणि लाभ यासंदर्भातील प्रश्नांचे निराकरण प्राधान्याने करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, ग्रामपंचायत स्तरावर या शिबिरांची व्यापक प्रसिद्धी करून जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, यासाठी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार बबनराव लोणीकर यांनी केले.
शिबिरांदरम्यान ७/१२ अभिलेखावरील दुरुस्ती, प्रलंबित फेरफार, नोंद दुरुस्ती, लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत प्रमाणपत्रे, डिजिटल ७/१२, ई-मोजणी, ई-फेरफार, पीएम किसान, अॅग्री स्टॅक, तक्रार निवारण, भूसंपादन, अकृषिक जमिनीचे प्रकरणे, तुकडेबंदी, तसेच अकृषिक परवानगीसंदर्भातील नोंदी अद्ययावत करणे यासह विविध कामे करण्यात येणार असल्याचे यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
तसेच प्रत्येक मंडळ मुख्यालयात एकखिडकी (सिंगल विंडो) प्रणाली स्थापन करून नागरिकांकडून प्राप्त अर्जांवर तत्काळ कार्यवाही करून त्याबाबत संबंधितांना कळविण्यात येणार आहे. भोगवटादार वर्ग-२ जमीन वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्यासाठी प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा डाटाबेस तयार करण्याचेही निर्देश या वेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी आपल्या भाषणात दिले.
याशिवाय तालुक्यातील शाळांमधील पात्र विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यासाठी शाळास्तरावर अर्ज गोळा करून ते ऑनलाईन प्रक्रियेद्वारे पूर्ण करण्यात येणार आहेत. तसेच सामाजिक अर्थसहाय्य योजनांतील पात्र लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करून शिबिरात मंजुरीचे आदेश वाटप करण्यात येणार आहेत.
पाणंद रस्ते तसेच ‘सर्वांसाठी घरे’ योजनेअंतर्गत उर्वरित लाभार्थ्यांची यादी तयार करून शिबिरामध्ये पट्टे वाटप करण्याच्या दृष्टीनेही कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आमदार बबनराव लोणीकर आपल्या भाषणात म्हणाले.
याप्रसंगी मंठा तालुक्यातील वायाळ पांगरी येथे उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड, मंठा तहसीलदार श्रीमती सुमन मोरे, उपविभागीय कृषी अधिकारी राम रोडगे, मंठा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गगनबोने, मंठा तहसीलचे नायब तहसीलदार कल्याण काळजात विकास राजपूत डीडी कुलकर्णी विष्णुपुरी, मंठा तालुका कृषी अधिकारी वाघमोडे, मंठा तालुका आरोग्य अधिकारी कुंडकर, मंठा तालुका भूमि अभिलेख अधिकारी पवार, भाजपा जालना तालुका अध्यक्ष विक्रम उफाड, मोहन आढे, महेश पवार, सरपंच परमेश्वर मानकर, वाईचे सरपंच सुनील ठाकरे, बिडी पवार, बाबुराव मास्तर, b बरबडा सरपंच प्रकाश हजारे यांच्यासह गावातील व परिसरातील हजारो महिला पुरुष शेतकरी शेतमजूर विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
तर् परतुर तालुक्यातील आष्टी येथे उपजिल्हाधिकारी मनीषा दांडगे, उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड, परतूर तहसीलदार दामोदर जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी राम रोडगे, परतुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश तांगडे, तालुका कृषी अधिकारी देवानंद सांगवे, भाजपा परतुर तालुका अध्यक्ष शत्रगुण कणसे, तुकाराम सोळंके, शहाजी राक्षे, बंकटनाना सोळंके, माणिकराव वाघमारे, सिद्धू केकान, गजानन लोणीकर, बाबाराव थोरात, अमोल जोशी, नसरुल्ला काकड, रमेश थोरात, सिताराम राठोड, निर्धास राठोड, सुधाकर जाधव, रमेश राठोड, कृष्णा टेकाळे, आष्टी चे ग्रामविकास अधिकारी डीबी काळे यांच्यासह आष्टी सर्कलमधील हजारो नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.





