जागतिक महिला दिन म्हणजे स्त्रीत्वाचा उत्सव. खरं तर प्रत्येक दिवस हा प्रत्येक स्त्रीचा असतो—तिच्या आत्मसन्मानाचा, तिच्या संघर्षाचा आणि तिच्या कर्तृत्वाचा. केवळ ती स्त्री आहे म्हणून भोगाव्या लागणाऱ्या वेदनांचा, तसेच ती स्त्री आहे म्हणूनच अनुभवता येणाऱ्या सर्जनशीलतेचा हा दिवस आहे.
ज्या मातीत राजमाता जिजाऊंनी स्वराज्याचे बीज रोवले, पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी न्याय आणि जनकल्याणाचे राज्य उभे केले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे उघडली आणि त्यागमूर्ती माता रमाईंनी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षात खंबीर साथ दिली, त्या महान आणि पुरोगामी वारशाचे आपण सारे वारसदार आहोत. आजच्या आधुनिक युगातही या महामातांचे विचार आणि कार्य आपल्याला प्रत्येक आव्हानावर मात करण्याची प्रेरणा देतात.
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समता आणि न्यायाचा अधिकार दिला असला, तरी आजही काही प्रतिगामी प्रवृत्ती स्त्रीच्या जन्माला, तिच्या स्वातंत्र्याला, शिक्षणाला आणि हक्कांना आव्हान देताना दिसतात. त्यामुळे संवेदनशील समाज म्हणून अशा विचारांना ठामपणे विरोध करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण हा आपल्या शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा आहे.
राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, त्यागमूर्ती माता रमाई आणि अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रियांचा आदर्श आपल्या समोर आहे. आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त आपण हा वसा आणि वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया.
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यासह आपल्या शहरातील सर्व माता-भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌹👩🎓👩⚕️👮♀️👩🎨👩🚒👩✈️🏃♀️⛹️♀️🏋️♀️🤼♀️🤾♀️💃




