उल्हासनगर / प्रतिनिधी:
उल्हासनगर शहरात कर्तव्य बजावत असताना एका कंत्राटी सफाई कामगारावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात कामगाराचा मृत्यू झाला असून पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पत्नीचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महादू जगताप (वय ३५) असे मृत कंत्राटी सफाई कामगाराचे नाव आहे. ते उल्हासनगर महानगरपालिकेच्या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कोणार्क इन्व्हायको या कंपनीत सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. ही घटना उल्हासनगर कॅम्प क्रमांक ३ मधील सेक्शन २० परिसरातील आनंद आईस्क्रीम पार्लरजवळ घडली.
नेहमीप्रमाणे महादू जगताप सकाळी साफसफाईचे काम करत असताना दुर्गेश गुप्ता (वय ३१) या तरुणाने त्यांच्यावर अचानक तीक्ष्ण शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या शरीरावर गंभीर वार करण्यात आले. हल्ला इतका भयानक होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी दुर्गेश गुप्ता याला ताब्यात घेत अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार आरोपी नशेत असल्याचे समोर आले असून दोघांमध्ये यापूर्वीही काही कारणावरून वाद झाल्याची माहिती पोलिस तपासात पुढे येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, पतीच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांची पत्नी पूर्वी महादू जगताप (वय ३२) यांना मोठा धक्का बसला. हा धक्का सहन न झाल्याने त्यांनीही टोकाचे पाऊल उचलल्याने त्यांचा मृत्यू झाला. एका कुटुंबातील दोघांचा अल्पावधीत झालेला मृत्यू हा अत्यंत दुर्दैवी प्रकार असून परिसरात शोककळा पसरली आहे.
या घटनेमुळे उल्हासनगरमधील सफाई कामगारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून रस्त्यावर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने अधिक ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.








