अंबरनाथ / प्रतिनिधी :
अंबरनाथ येथील आनंद नगर एमआयडीसी परिसरातील ‘श्री गणेश केमिकल’ कंपनीला लागलेली भीषण आग अखेर पूर्णपणे आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आज सकाळपर्यंत आग पूर्णपणे विझवण्यात आली असून सध्या कुलिंगचे कामही पूर्ण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५:३० वाजण्याच्या सुमारास कंपनीत अचानक आग लागली. कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा असल्यामुळे आग काही मिनिटांतच भीषण स्वरूप धारण करत परिसरात धुराचे मोठे लोट पसरले. सायंकाळी ५:३० ते ७:०० या वेळेत आगीची तीव्रता सर्वाधिक होती, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ आणि बदलापूर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्रभर शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.
या भीषण आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.










