मारेगाव (प्रतिनिधी) : मारेगाव तालुक्यातील मार्डी सर्कल अंतर्गत दांडगाव, आपटी व घाट परिसरात अवैध वाळू उत्खननाचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. महसूल विभागाच्या कथित दुर्लक्षामुळे वाळू माफियांनी अक्षरशः कायद्याला धाब्यावर बसवले असल्याची भावना व्यक्त होत आहे.
आपटी घाट परिसरात नियमांचे उल्लंघन करून पोकलेन व जेसीबीसारख्या यंत्रसामग्रीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असल्याचे समोर आले आहे. नियमानुसार घाटातील रेती उपसा हा मर्यादित प्रमाणात व ठराविक प्रक्रियेद्वारे करणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात मात्र यंत्रांच्या वापरातून बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नदी पात्राच्या मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात उत्खनन होत असल्याने भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच पर्यावरणीय हानीसह नैसर्गिक समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
याशिवाय अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रकमध्ये ओव्हरलोड वाहतूक केली जात असून ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
या सर्व प्रकाराची माहिती असूनही महसूल विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आपटी परिसरातील नागरिकांनी केला आहे. अवैध उत्खनन तात्काळ थांबवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.







