पंढरपूर (प्रतिनिधी) :
चैत्री वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील बस स्थानक तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित केल्याने वारकरी व प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांनी शहरात पाहणी केली असता मुख्य बस स्थानक वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी तीन-चार ठिकाणी विभागून हलवण्यात आल्याचे दिसून आले. मात्र, या निर्णयामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र समोर आले आहे.
वृद्ध, महिला व लहान मुलांना स्थलांतरित बसस्थानके शोधण्यासाठी आणि तेथे पोहोचण्यासाठी उन्हात त्रास सहन करावा लागत आहे.
- २७ मार्च ते ३० मार्च या कालावधीत प्रवाशांचे अतोनात हाल झाले
- सामान घेऊन उन्हात भटकंती करावी लागत असल्याने वारकऱ्यांची परवड होत आहे
रिक्षाचालकांकडून जादा भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत, ज्यामुळे प्रवाशांच्या अडचणीत आणखी भर पडत आहे.
तसेच स्थलांतरित बस स्थानकांवर धुळीचे प्रमाण अधिक असून वाहनांची योग्य व्यवस्था नसल्याने प्रवाशांना इच्छित गाडी शोधताना मोठी कसरत करावी लागत आहे.
चैत्री व माघी वारीत एवढी मोठी गर्दी नसतानाही अशा प्रकारे स्थानक स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
प्रशासनाने निर्णय घेताना प्रवाशांचा विचार करावा आणि योग्य नियोजन करावे, अशी मागणी वारकरी व नागरिकांकडून होत आहे.











