कोल्हापूर | विशेष प्रतिनिधी :
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती निवडीत महिलांनी वर्चस्व गाजवत ६ पैकी ५ पदांवर विजय मिळवला आहे. या निकालामुळे जिल्हा परिषदेत ‘महिला राज’ प्रस्थापित झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
निवडीनंतर सभागृहात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील यांनी “आता पाचही पदांवर बहिणी आल्या आहेत, तेव्हा लाडक्या भावांना सांभाळून घ्या,” अशी मिश्किल टिप्पणी करताच हास्यलहरी उमटल्या. निवडीनंतर समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.
शिक्षण व अर्थ समितीच्या सभापतीपदी शीतल यादव यांची निवड झाली असून, यापूर्वी त्यांचे पती प्रवीण यादव यांनीही हेच पद भूषवले होते. बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापतीपदी सारिका नांदेंकर यांची निवड झाली असून, त्यांच्या कुटुंबाला राजकारणाचा मोठा वारसा आहे.
चंदगड तालुक्यातील विद्या विलास पाटील यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवत आपले स्थान बळकट केले, तर श्रद्धा गायकवाड यांनी पहिल्याच प्रयत्नात समाजकल्याण समितीच्या सभापतीपदावर निवड होत मोठे यश मिळवले.
या निवड प्रक्रियेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, विजय बलुगडे, माजी आमदार राजेश पाटील, उल्हास पाटील, गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, संजय यद्रावकर, सतीश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या ऐतिहासिक निवडीमुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळाल्याचे मत व्यक्त होत असून, जिल्हा परिषदेत महिलांच्या नेतृत्वाखाली विकासकामांना नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






