📝 अंदरसुल (प्रतिनिधी) :
येवला तालुक्यातील भारम येथे दर शनिवारी भरत असलेला आठवडे बाजार हा शेतकरी हिताचा ठरत असून आता या बाजारात शेळी-मेंढी खरेदी-विक्रीलाही सुरुवात करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे परिसरातील शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
भारम हा परिसर डोंगरगाव, तळवाडे, पिंपळखुटे खुर्द/बुद्रुक, आडसुरेगाव, वाघाळे, रहाडी, वडजी, खरवंडी, देवदरी, ममदापूर, अंगुलगाव, कोळम खुर्द/बुद्रुक अशा सुमारे ८ ते १० गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने येथे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाची ये-जा असते.
यापूर्वी या आठवडे बाजारात भाजीपाला, भुसार व धान्य व्यवहार होत होता. मात्र, डोंगरगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे खरेदी-विक्री केंद्र सुरू झाल्यामुळे परिसरात शेतीमालाची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार या कालावधीतही भारम व डोंगरगाव परिसरात शेतकऱ्यांची वर्दळ वाढलेली दिसून येते.
याच पार्श्वभूमीवर गरीब शेतकऱ्यांची “चालती-बोलती बँक” मानल्या जाणाऱ्या शेळी-मेंढी वर्गीय जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी स्वतंत्र बाजार सुरू करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. विद्यमान सरपंच/प्रशासक श्रीमती मंदाताई गांजे यांच्या पुढाकारातून शनिवार, दि. ०४ एप्रिल २०२६ पासून ग्रामपंचायत कंपार्टमेंट येथे या बाजारास प्रारंभ होणार आहे.
या नव्या बाजाराचे भूमिपूजन सकाळी ९:३० वाजता करण्यात येणार असून परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेळ्या-मेंढ्या खरेदी-विक्रीसाठी आणाव्यात, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे. तसेच सर्व मान्यवर, पदाधिकारी व ग्रामस्थांनी या उपक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवरच बाजारपेठ उपलब्ध होणार असून त्यांच्या आर्थिक व्यवहारांना चालना मिळणार आहे.










