आजरा (प्रतिनिधी):
आजरा शहरातील अमृतजल पाणी पुरवठा योजनेच्या कामात झालेल्या चुकीच्या नियोजनाचा फटका सध्या नागरिकांना बसत असून ऐन उन्हाळ्यात शहरात ‘पाणीबाणी’ निर्माण झाली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला असून नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या पार्श्वभूमीवर नगरसेविका डॉ. स्मिता कुंभार यांनी प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अमृतजल योजनेअंतर्गत गांधीनगर ओढ्यापासून आयडीयल कॉलनीपर्यंत पाईपलाईन रस्त्याच्या मधोमध टाकण्यात आली होती. तसेच गटारीचे बांधकामही रस्त्याच्या हद्दीपासून ७ ते ८ फूट आत करण्यात आल्याने रस्ता अरुंद झाला आणि अतिक्रमणाचा धोका निर्माण झाला होता. या गंभीर त्रुटींविरोधात अन्याय निवारण समितीने मागील तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले असले, तरी आता दुरुस्तीच्या कामामुळे नागरिकांना पाण्याविना राहावे लागत आहे.
दरम्यान, नगरसेवक बामणे भाऊजी यांनी ही समस्या पालकमंत्री आबिटकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ दखल घेत गटार व पाईपलाईनचे काम योग्य पद्धतीने करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सध्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
जनतेचे हाल :
• चार दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प
• नागरिकांना टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ
• दुर्गम भागातील नागरिकांची अधिक गैरसोय
डॉ. स्मिता कुंभार यांनी सांगितले की, “सुरुवातीलाच नियोजनबद्ध काम झाले असते, तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेचा फटका सामान्य जनतेला बसत आहे.”
दरम्यान, ठेकेदार सुपरवायझर रमेश गस्ती यांनी माहिती दिली की, “काम रात्रंदिवस सुरू असून जमिनीखाली कठीण दगड लागल्याने थोडा विलंब होत आहे. मात्र लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.”
या संपूर्ण कामावर नगरसेवक असिफ सोनेखान हेही प्रत्यक्ष पाहणी करत असून प्रशासनाच्या चुका दुरुस्त करताना अजरावासीयांना मात्र कोरड्या घशाने वाट पाहावी लागत आहे.











