महाराष्ट्रात प्रशासनिक पातळीवर मोठा फेरबदल करण्यात आला असून राज्य सरकारने तब्बल २५ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर आणि सोलापूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांचा समावेश असून अनेक जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी तसेच महापालिकांना नवे आयुक्त मिळाले आहेत.
जिल्हाधिकारी स्तरावरील बदल्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे विनय गौडा जी.सी. यांची नियुक्ती करण्यात आली असून ते यापूर्वी चंद्रपूर येथे कार्यरत होते. नागपूर येथे कुमार आशीर्वाद, कोल्हापूर येथे डॉ. विजय राठोड, तर सोलापूर येथे कार्तिकेयन एस. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच चंद्रपूर येथे श्रीमती वसुमना पंत, लातूर येथे डॉ. भारत बस्तेवाड, बुलढाणा येथे डॉ. प्रवीणकुमार देवरे आणि गोंदिया येथे डॉ. मंगेश गोंदवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त स्तरावरही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे अमोल येडगे, कोल्हापूर येथे डॉ. राजेंद्र भारुड, अमरावती येथे श्रीमती वर्षा लड्डा, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत श्रीमती संजिता मोहपात्रा आणि जालना येथे श्रीमती अंजली शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या व्यापक बदल्यांमुळे राज्य प्रशासनाला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, नव्याने नियुक्त अधिकाऱ्यांसमोर स्थानिक पातळीवरील विकासकामांना गती देण्याचे मोठे आव्हान असणार आहे.









