सेलू (ता. प्रतिनिधी) :
पुनर्वसन ग्रामपंचायत गरमसूर येथे शासनाच्या १५ लाख रुपये प्रति व्यक्ती पॅकेज मोबदला तसेच घरजागा व शेती मोबदल्यासाठी आज, दि. ३ एप्रिल रोजी महत्त्वपूर्ण प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.
केळझर येथील शासन मान्यता प्राप्त बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गरमसूर येथे उपस्थित राहून लाभार्थ्यांच्या खात्यांशी संबंधित कामकाज सुरू केले. यामध्ये निधीचे नियोजन, खात्यांची पडताळणी तसेच आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.
या निधीमुळे ग्रामस्थांना घरबांधणी, शेती विकास तसेच इतर मूलभूत गरजा पूर्ण करण्यास मोठी मदत होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही प्रक्रिया आता प्रत्यक्षात सुरू झाल्याने गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांच्या मते, या निधीच्या माध्यमातून गरमसूर गावाचा सर्वांगीण विकास होणार असून नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय बदल होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळाल्यामुळे प्रशासनाविषयी सकारात्मक भावना निर्माण झाली असून ही प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.










