शेवगाव (प्रतिनिधी – लक्ष्मण मडके) : बेलगाव ग्रामपंचायतीतील पाणीपुरवठा कर्मचारी भरती प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने युवक संदीप नानासाहेब काकडे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
काकडे यांनी पंचायत समिती शेवगाव येथील गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत दि. १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
भरती प्रक्रियेदरम्यान नियमबाह्य प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला असून, परीक्षेच्या दिवशी ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे पती परीक्षा केंद्रात उपस्थित असल्याचे अनेक परीक्षार्थींनी ग्रामसभेत नमूद केल्याचे काकडे यांनी सांगितले. यासंदर्भात काही विद्यार्थ्यांचे लेखी जबाब, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
दरम्यान, प्रशासनाने सादर केलेला प्राथमिक चौकशी अहवाल अपूर्ण व एकतर्फी असल्याचा आरोप करत तो रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांमध्ये २६ जानेवारी २०२६ च्या ग्रामसभेतील मुद्दा नोंदवलेला नसल्याने संशय अधिक गडद झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार तसेच मागील पाच वर्षांतील विकासकामांमध्ये आर्थिक अनियमिततेचे आरोपही करण्यात आले आहेत. या सर्व बाबींवर अद्याप ठोस चौकशी न झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविषयी अविश्वास निर्माण झाल्याचे काकडे यांनी सांगितले.
यापूर्वी प्रशासनाने चौकशीचे आश्वासन दिले होते; मात्र तीन महिने उलटूनही कारवाई न झाल्याने आता आमरण उपोषणाशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भरती प्रक्रिया रद्द करणे, निष्पक्ष पुनर्चौकशी करणे, दोषींवर कारवाई करणे तसेच मागील विकासकामांची चौकशी करणे या प्रमुख मागण्यांसह हे आंदोलन छेडले जाणार आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर वातावरण तापले असून, १३ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आमरण उपोषणामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.











