कन्नड (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेतपांदण रस्ता योजने’अंतर्गत १ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, ताड पिंपळगाव ते शेवता गाव शिवारातील सुमारे ८ किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या खडीकरण कामाचा शुभारंभ आमदार संजना जाधव यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.
ताड पिंपळगाव आणि शेवता परिसरातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तसेच उत्पादित माल बाजारपेठेत नेण्यासाठी कच्च्या रस्त्यांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब होत असल्याने दळणवळण विस्कळीत होत असे. या पार्श्वभूमीवर मंजूर झालेल्या या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा अनेक वर्षांचा वनवास संपणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
यावेळी बोलताना आमदार संजना जाधव म्हणाल्या की, “मतदारसंघातील प्रत्येक गाव व वाडी-वस्ती मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शेतपांदण रस्ते सक्षम झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळते. १ कोटी ६० लाखांच्या निधीतून दर्जेदार आणि टिकाऊ काम करण्यावर आमचा भर असून उर्वरित रस्त्यांचे प्रश्नही टप्प्याटप्प्याने मार्गी लावले जातील.”
दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाल्याने ताड पिंपळगाव व शेवता परिसरातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत आमदारांचे आभार मानले.
या शुभारंभ कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.










