रिसोड (प्रतिनिधी) : रिसोड शहरातील अमरदास बाबा रोडवरील अष्टभूजा माता चौक परिसरातील भाग क्रमांक २ मध्ये नादुरुस्त विद्युत रोहित्रांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात रात्रीच्या वेळी अचानक वीज जाण्याचे प्रकार वाढले असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना याचा अधिक फटका बसत आहे. रोहित्रांची नियमित देखभाल न झाल्याने तसेच फ्यूज नसल्यामुळे वाऱ्यासह पावसाच्या वेळी शॉर्ट सर्किट होण्याच्या घटना घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे उकाडा, डासांचा प्रादुर्भाव वाढत असून डेंगूसारख्या आजारांचा धोका निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
महावितरण विभागाने तात्काळ दखल घेऊन नादुरुस्त रोहित्रांची दुरुस्ती करावी व वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.










