शहादा, दि.०४ (प्रतिनिधी) : शहरातील टेक भिलाटी, अब्दुल हमीद चौक, मच्छी बाजार, तकीया बाजार आणि भारत नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कुत्र्यांच्या दहशतीमुळे लहान मुले व नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या मुलांवर अचानक हल्ले होत असून दुचाकीस्वारांनाही या कुत्र्यांनी धावून जाऊन चावा घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका देखील वाढला आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिक गंभीर बनत असून कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ व रहिवासी भागात कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
समस्त शहादा शहरवासीयांनी या समस्येबाबत नगरपालिकेकडे तक्रार केली असून, “मुलांना शाळेत पाठवताना व बाजारात जाताना सतत भीती वाटते. पिसाळलेल्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा,” अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
टेक भिलाटी ते भारत नगरपर्यंत कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्याने प्रशासनाने विशेष मोहीम राबवून या कुत्र्यांना पकडावे व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. आता शहादा नगरपालिका या गंभीर समस्येकडे किती गांभीर्याने लक्ष देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










