श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी) : श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प.पू. मधुसूदनजी भारती महाराज (वय ९५) यांचे शनिवार, दि. ४ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ५:०५ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे माहूर परिसरासह असंख्य भाविकांमध्ये शोककळा पसरली आहे.
प.पू. अच्युत भारती महाराज यांच्या वैकुंठवासानंतर सन १९७८ मध्ये मधुसूदनजी भारती महाराज संस्थानच्या गादीवर विराजमान झाले होते. साधेपणा, अध्यात्मिक चिंतन आणि भक्तीभाव ही त्यांच्या जीवनाची ओळख होती. त्यांनी आपल्या कार्यकाळात श्री दत्त शिखर संस्थानच्या परंपरा जपत विविध धार्मिक उपक्रम, पूजा-अर्चा आणि उत्सव भक्तिभावाने पार पाडले.
त्यांच्या प्रवचनांतून त्यांनी अध्यात्म, नैतिक मूल्ये आणि संस्कार यांचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचवला. प्रेमळ स्वभाव आणि साधी जीवनशैली यामुळे त्यांनी भाविकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.
निधनाची वार्ता समजताच माहूर व परिसरातील भाविकांनी दत्त शिखर येथे अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी केली. अनेक संत, महंत व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार असून पुढील कार्यक्रमांची माहिती संस्थानतर्फे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
प.पू. मधुसूदनजी भारती महाराज यांच्या जाण्याने अध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या कार्याच्या आणि विचारांच्या स्मृती भाविकांच्या मनात सदैव जिवंत राहणार आहेत.











