श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी) : श्री दत्त शिखर देवस्थानचे महंत प.पू. मधुसूदन भारतीजी महाराज यांच्या निधनानंतर रविवार, दि. ५ एप्रिल २०२६ रोजी अंतिम दर्शनासाठी माहूरगड येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या नियोजनास भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार अभिजित जगताप यांनी केले आहे.
भाविकांच्या मोठ्या गर्दीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था, पार्किंग तसेच इतर मूलभूत सुविधांवर ताण येण्याची शक्यता असून, काही आस्थापना तात्पुरत्या स्वरूपात बंद राहू शकतात. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या भाविकांना गैरसोय होऊ नये यासाठी प्रवासाचे नियोजन टप्प्याटप्प्याने करावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
तसेच संभाव्य ट्रॅफिक कोंडी आणि आरोग्य सेवा, हॉटेल्स यांच्यावर येणारा ताण लक्षात घेता, काही काळासाठी गडावरील वाहतूक नियंत्रित केली जाऊ शकते. त्यामुळे भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून, नागरिकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही तहसीलदार अभिजित जगताप यांनी स्पष्ट केले आहे.











