बागलाण (प्रतिनिधी) : बागलाण तालुक्यात अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले असताना कंधाणा फाटा ते चौंधाणे मार्गावर महामार्गावर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरि अण्णा जाधव यांनी तत्परता दाखवत रस्ता काही तासांत मोकळा करून सामाजिक बांधिलकी जपली.
सोमवारी दुपारी सुमारे तीन वाजता झालेल्या मुसळधार पावसासह गारपिटीमुळे द्राक्ष बागा, कांदा, मका, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. याच दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यामुळे महामार्गावर मोठी झाडे कोसळली. परिणामी, रात्री वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक ठप्प झाली होती.
घटनेची माहिती मिळताच हरि अण्णा जाधव यांनी प्रशासनाची वाट न पाहता युवकांसह घटनास्थळी धाव घेतली. कुऱ्हाडी व यंत्रसामग्रीच्या सहाय्याने झाडांच्या फांद्या तोडून बाजूला करण्यात आल्या. भर पावसात रात्री उशिरापर्यंत, तब्बल दोन ते तीन वाजेपर्यंत हे काम सुरू ठेवण्यात आले.
त्यांच्या या तत्परतेमुळे काही तासांतच रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला आणि अडकून पडलेल्या शेकडो प्रवाशांना दिलासा मिळाला. वाहनचालकांनी हरि अण्णा जाधव व युवकांचे आभार मानले असून त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.










