मळद (प्रतिनिधी) : शेलारमळा येथील आई श्री रासाईदेवीची वार्षिक यात्रा उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. मात्र, उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आलेल्या अवकाळी पावसामुळे कुस्त्यांचा भव्य आखाडा रद्द करावा लागल्याने कुस्तीप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त झाली.
गुरुवारी सकाळी देवीच्या महाअभिषेकाने उत्सवाची सुरुवात झाली. दुपारी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने देवीसमोर दंडवत घालत शेरणी अर्पण केली. दिवसभर मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. रात्री हलगी पथकाच्या गजरात आणि दारूकामाच्या भव्य आतिषबाजीसह देवीचा छबिना काढण्यात आला. या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला. त्यानंतर रात्री ‘कैरी मी पाडाची’ या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाने यात्रेची रंगत आणखी वाढवली, ज्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
दरम्यान, शुक्रवारी दुपारी कुस्त्यांचा भव्य आखाडा आयोजित करण्यात आला होता. आखाड्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली होती आणि अनेक नामवंत पैलवान मैदानात दाखल झाले होते. मात्र, ऐनवेळी आलेल्या पावसामुळे मैदान ओले व निसरडे झाल्याने कुस्त्यांचे सामने घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे आयोजकांनी सुरक्षेच्या कारणास्तव आखाडा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे कुस्त्यांचा थरार पाहण्यासाठी दूरदूरवरून आलेल्या कुस्तीप्रेमींना निराश होऊन परतावे लागले.
पावसाच्या या व्यत्ययानंतरही सायंकाळी ७ वाजता भाविकांच्या उपस्थितीत ‘मानाचा विडा’ वाटप करून यात्रेची सांगता करण्यात आली. संपूर्ण उत्सवाचे नियोजन श्री रासाईदेवी युथ फाउंडेशन, शेलारमळा यांच्या वतीने अत्यंत शिस्तबद्ध आणि सुरळीतपणे करण्यात आले. पावसामुळे केवळ कुस्त्यांचा कार्यक्रम रद्द झाला असला, तरी इतर सर्व धार्मिक विधी आणि कार्यक्रम उत्साहात पार पडले.










