श्रीक्षेत्र माहूर : येथील श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प. पू. मधुसूदनजी भारती महाराज (गुरु प. पू. अच्युत भारती महाराज) (वय ९५) यांचे शनिवार, दि. ४ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने माहूरसह संपूर्ण धार्मिक क्षेत्रात शोककळा पसरली असून असंख्य भक्तगण शोकसागरात बुडाले आहेत.
माहितीनुसार, हिंदू धर्मपरंपरेनुसार त्यांनी काही दिवसांपासून प्रयोपवेशन (संकल्पपूर्वक देहत्यागाची साधना) स्वीकारली होती. त्यानंतर शांतपणे त्यांनी आपल्या इहलोकातील प्रवासाची सांगता केली.
सन १९७८ मध्ये त्यांचे गुरु प. पू. अच्युत भारती महाराज वैकुंठवासी झाल्यानंतर धार्मिक परंपरेनुसार प. पू. मधुसूदनजी भारती महाराज यांची श्री दत्त शिखर संस्थानच्या गादीवर नियुक्ती करण्यात आली होती. तब्बल चार तप (सुमारे ४८ वर्षे) त्यांनी या गादीवर विराजमान राहून कठोर तपश्चर्या, साधना आणि धर्मसेवा केली.
त्यांच्या कार्यकाळात संस्थानच्या धार्मिक परंपरा जपण्यासोबतच विविध पूजा-अर्चा, उत्सव आणि धार्मिक उपक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडत होते. त्यांच्या प्रवचनातून त्यांनी अध्यात्म, नैतिक मूल्ये आणि संस्कारांचा संदेश हजारो भाविकांपर्यंत पोहोचवला.
साधेपणा, अध्यात्मिक तेज आणि भक्तांप्रती असलेली आत्मीयता यामुळे ते सर्वांच्या श्रद्धास्थानी होते. त्यांच्या जाण्याने श्री दत्त शिखर संस्थानमध्ये मोठी आध्यात्मिक पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या पश्चात असंख्य शिष्य, भक्तपरिवार व धर्मप्रेमी नागरिक असा मोठा परिवार असून, त्यांच्या स्मृती व कार्य भाविकांच्या मनात सदैव जिवंत राहणार आहेत.








