किनवट (प्रतिनिधी) – उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन किनवट नगर परिषद प्रशासनाने यंदा आगाऊ उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरातील कोणत्याही प्रभागात पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवू नये, यासाठी पाणीपुरवठा सभापती निलोफर भाटी यांनी युद्धस्तरावर दुरुस्ती कामे हाती घेतली आहेत.
नगराध्यक्षा सौ. सुजाता एंड्रलवार यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा विभागाकडून शहरातील गळती असलेल्या पाइपलाइन दुरुस्त करण्यासोबतच सार्वजनिक नळांवर नवीन व मजबूत तोट्या बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. “पाण्याचा प्रत्येक थेंब वाचला पाहिजे” या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात येत आहे.
प्रत्यक्ष पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे नळांना तोट्या नसल्यामुळे दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर मागील आठ दिवसांत सुमारे ५०० हून अधिक नळांना नवीन तोट्या बसवण्यात आल्या असून त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे.
याशिवाय ज्या भागात पाणी कमी दाबाने येते किंवा तांत्रिक अडचणी आहेत, त्या त्वरित दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार बोअरवेल व पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याची तयारीही प्रशासनाने ठेवली आहे.
“उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याची समस्या उद्भवू नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. गळती रोखून प्रत्येक घरापर्यंत मुबलक आणि सुरळीत पाणीपुरवठा करणे हाच आमचा ध्यास आहे,” असे पाणीपुरवठा सभापती निलोफर निसार भाटी यांनी सांगितले.
प्रशासनाच्या या तत्पर कामगिरीमुळे किनवटकर नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, प्रत्यक्ष प्रभागात जाऊन समस्या सोडवण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. या मोहिमेमुळे यंदाच्या कडक उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.








