परभणी | प्रतिनिधी:
मौजे वझूर (खु.) येथे शेत रस्ता बंद झाल्यामुळे वाव्हळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून, प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात त्यांनी आता आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. जनार्दन चोखोबा वाव्हळे व त्यांच्या कुटुंबीयांनी येत्या ६ एप्रिल २०२६ पासून मानवत तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जदार जनार्दन वाव्हळे यांची शेतजमीन गट क्रमांक ९२ मध्ये असून, त्यांच्या भावाची जमीन गट क्रमांक ७७ मध्ये आहे. या दोन्ही शेतांदरम्यान जाणारा पारंपरिक वहिवाट रस्ता उत्तम सोपान कटके यांनी अडवून बंद केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रस्ता बंद झाल्यामुळे शेतात जाण्याचा मार्ग बंद पडला असून, शेती पडीक राहिली आहे. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या प्रकरणी यापूर्वीही अनेक वेळा प्रशासनाकडे अर्ज करण्यात आले होते. २० जून २०२५ रोजी संबंधित अधिकाऱ्यांनी रस्ता खुला करण्याचे आदेश दिले होते. तसेच ११ डिसेंबर २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी पाथरी यांनीही याबाबत आदेश दिले होते. त्यानंतरही १९ जानेवारी, १८ फेब्रुवारी आणि २३ मार्च २०२६ रोजी वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
“प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने आम्ही हतबल झालो आहोत. रस्ता खुला न झाल्यास आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल,” असे अर्जदारांनी सांगितले. त्यामुळेच त्यांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही वाव्हळे कुटुंबाने दिला आहे. या अर्जाच्या प्रती जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सादर करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणाकडे प्रशासन कसे लक्ष देते आणि काय निर्णय घेते, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.









