येवला/अंदरसुल | प्रतिनिधी:
राज्यात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येवला तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत तीव्र निदर्शने करण्यात आली. “नरेंद्र, कब मिलेगा सिलेंडर” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रतिक अशोकराव शिंदे यांनी केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ॲड. भाऊसाहेब अहिरे, जिल्हा सचिव ॲड. सिद्धार्थ अहिरे, युवा तालुका उपाध्यक्ष आशिष अहिरे, तालुका सचिव अमोल सोनवणे, संपर्क प्रमुख प्रेम शिंगाडे, माऊली जोगदंड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
गेल्या काही महिन्यांपासून येवला तालुक्यासह ग्रामीण भागात गॅस सिलेंडर मिळण्यासाठी नागरिकांना ४० ते ४५ दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. गॅस एजन्सींकडे वारंवार चकरा मारूनही सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने विशेषतः महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना घेराव घालत प्रशासनाकडे जाब विचारला. आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सुपूर्द करण्यात आले.
प्रमुख मागण्या:
- येवला तालुक्यातील गॅस पुरवठा तात्काळ सुरळीत करावा
- काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर कडक कारवाई करावी
- गॅस रांगेतील अडवणूक व नागरिकांचा होणारा मानसिक छळ थांबवावा
“सरकारच्या नियोजनशून्यतेमुळे नागरिकांना गॅससाठी वणवण भटकावे लागत आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी न लागल्यास यापेक्षाही उग्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा प्रतिक अशोकराव शिंदे यांनी दिला.


