सेलू तालुका | प्रतिनिधी :
घोराड गावात १५ वा वित्त आयोग (सन २०२४-२५) व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत उभारण्यात आलेले कचरा विलगीकरण केंद्र सध्या पूर्णपणे निष्क्रिय अवस्थेत असून केवळ कागदोपत्रीच असल्याचे समोर आले आहे. लाखो रुपये खर्चून उभारलेले हे केंद्र बंद अवस्थेत पडून असल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
गावातील रस्ते, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि संभाव्य आजारांचा धोका वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. स्वच्छ भारत मिशनचा केवळ फलक लावून काम उरकले का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या संदर्भात ग्रामसेवकांकडे विचारणा केली असता त्यांनी “गावातील कचरा डेपो कुठे आहेत किंवा कचरा कुठे टाकला जातो याची माहिती नाही,” असे सांगितल्याने प्रशासनाच्या जबाबदारीबाबत अधिकच संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे ग्रामपंचायत प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आला असून निधीच्या वापराबाबतही गावात चर्चा सुरू आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच कचरा व्यवस्थापन प्रणाली त्वरित कार्यान्वित करून गाव स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.










