नायगांव | वार्ताहर :
कळंब तालुक्यातील रांजणी येथील ग्रामदैवत शहीद हजरत ख्वाजा बद्रोद्दीन रहेमतुल्ला आलैय यांच्या उरुस उत्सवाचे मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात आयोजन करण्यात आले. या उरुसात हिंदू-मुस्लिम समाजबांधवांनी एकत्र येत ऐक्याचा आदर्श घालून दिला.
मुंबई, कल्याण, हैदराबाद, पुणे तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उरुसाची सुरुवात शनिवारी मक्का मस्जिद येथून पारंपरिक संदल मिरवणुकीने झाली. डॉल्बीमुक्त वातावरणात बँड, हलगी, झांज पथक, आतषबाजी आणि मिलाद कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
रविवारी अहमदाबाद येथील मशहूर कव्वाल साहिल अली साबरी व दिल्ली येथील तमन्ना बानो यांनी कव्वाली सादर केली, तर सोमवारी लखनऊचे साकिब अली साबरी आणि मुंबईच्या नुसरत खानम यांच्यात रंगलेला जंगी मुकाबला भाविकांना मंत्रमुग्ध करून गेला.
मंगळवारी जियारत, फातेहा खानी आणि सलाम कार्यक्रमाने उरुसाची सांगता करण्यात आली. यावेळी दर्गा परिसर, मुख्य चौक, हनुमान मंदिर आणि ग्रामरस्ते आकर्षक रोषणाईने उजळून निघाले होते.
उरुसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये क्रिकेट, वक्तृत्व आणि कॅरम स्पर्धांचा समावेश होता. विजेत्यांना चषक व आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या उरुसाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी उरुस कमिटीचे अध्यक्ष शफिक पटेल, उपाध्यक्ष अलीम शेख तसेच इतर पदाधिकारी, ग्रामपंचायत, महावितरण कंपनी, पोलीस प्रशासन आणि समस्त ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
रांजणी येथील हा उरुस केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक सलोखा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असल्याचे यावेळी प्रकर्षाने जाणवले.











