अहिल्यानगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावाजवळील गारपीर देवा परिसरात भीषण आग लागून अंदाजे 100 ते 150 एकर क्षेत्र जळून खाक झाले आहे. या आगीत मोठ्या प्रमाणावर गवताळ जमीन, झुडपे तसेच काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
संध्याकाळच्या सुमारास लागलेली ही आग वाऱ्याच्या वेगामुळे झपाट्याने पसरली. परिस्थिती गंभीर होताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक संपत्तीचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचा चारा व गवत जळाल्यामुळे आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोरड्या गवताळ भागात निष्काळजीपणे आग लावणे टाळावे व नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात आले आहे.











